मैतर

May 24, 2008 at 2:32 pm | In कुवेत, मराठी | 4 Comments

“मैतर” ह्या कार्यक्रमाबद्दल जेव्हा मेल आली ना….. तेव्हाच सगळे जण फार उत्सुक होते आणि आनंदात सुद्धा.  एकतर ह्या कार्यक्रमात सगळी आपापल्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी होती आणि दुसरं म्हणजे कुवेतला असूनही इतका चांगला कार्यक्रम बघायला मिळणार होता.  त्यामुळे १६ मे कधी उजाडते असं झालं होतं.  पण १३ मे च्या संध्याकाळी ती वाईट बातमी कानावर पडली आणि सगळ्यात पहिले मनात हाच विचार आला की आता १६ तारखेच्या कार्यक्रमाचं काय होणार….!

पण आपल्या कार्यकारी समितीने जीवाचं रान करुन हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल त्यांचं  कौतुक करायलाच हवं.  १६ मे च्या सविस्तर कार्यक्रमात थोडा बदल करुन शनिवारी १७ मे ला सकाळी बारा वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला.  भारतीय दूतावासातले श्री.भाटिया….. ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होऊ शकला त्यांचे जितके आभार मानावे तितके थोडेच आहेत.  एकतर इतक्या दिग्गज मंडळींच्या एकत्र तारखा मिळणं खूप कठीण होतं.  त्यात सगळं ठरल्यानंतर हा कार्यक्रम जर रद्द झाला असता तर सगळ्यांच्याच उत्साहावर पाणी फिरलं असतं.  पण सगळं व्यवस्थित जुळून आलं आणि “मैतर” सारख्या जबरदस्त कार्यक्रमाचा आस्वाद आम्हा रसिकांना घेता आला.

कार्यक्रम थोडा उशीरा सुरु झाला तरी कार्यक्रम सुरु झाल्यावर मात्र त्या उशीराची कोणाला काहीच जाणीव झाली नाही इतकं ह्या कलाकारांनी सगळ्यांना खिळवून ठेवलं.  सुरवातीला कुवेतच्या राजाला दोन मिनिटांचं मौन पाळून श्रद्धांजली देण्यात आली.  सगळ्या कलाकारांचा अध्यक्ष श्री.सुनील विपट ह्यांच्या हस्ते सत्कार आणि महाराष्ट्र मंडळाच्या स्मरणिकेचं प्रकाशन होऊन कार्यक्रम सुरु झाला. 

भारतीय दूतावासाचे श्री. भाटिया काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम सुरु झाल्यावर पोहोचले.  पण ते आल्यानंतर कार्यक्रम मधे थांबवून समितीने त्यांचे मनापासून आभार मानले.  

सुबोध भावेंनी एकेक करत त्यांच्या सगळ्या मैतरांची ओळख करुन दिली.  प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातला दादा.  संदीप खरे आणि सलिल कुळकर्णी ही जोडगळी, शौनक अभिषेकी सारखं शास्त्रीय संगीतातलं व्यक्तिमत्व, बेला शेंडे सारखी गुणी गायिका आणि शर्वरी जमेनिस सारखी नृत्यांगना…. सगळेच अतिशय उच्च.  आपापली ओळख करतानाच त्यांनी त्यांची कलाकारी दाखवली.  आणि मग ह्या सहा मैतरांची मैफ़ल रंगतच गेली.  शौनक, संदीप आणि सलिल ह्यांच्या हजरजवाबी विनोदांनी तर अजूनच खुमारी चढली कार्यक्रमाला.

सुबोध भावेंचा अभिनय बघून तर अंगावर काटाच आला….अक्षरश: खिळवून ठेवलं त्यांनी सगळ्यांना.  संदीपच्या कविता आणि वाचन……तर अगदी लाजवाब.  त्यांचे शब्दोच्चार, त्यातले पॉझेस….. यामुळे अधिकच उठाव आला.  शौनक अभिषेकींच्या आवाजाची जादू काही वेगळीच होती.  बेला शेंडेनी तर आपल्या स्वरमोहिनीने सगळ्यांना अगदी धुंद करुन टाकलं.  शर्वरीने आपल्या पदन्यासाने आणि भावमुद्रांनी अगदी आपलसं केलं.  सलिल ने इंग्लिशमधे गायलेलं गाणं जबरदस्त दाद घेऊन गेलं.

मध्यांतरात खाणं आटोपून सगळे पुन्हा आपापल्या जागी स्थानापन्न झालेत.  ह्या भागात ह्या कलाकारांनी एक वेगळाच रंग भरला.  ज्या क्षेत्रात ते परिचित नाहीत त्या क्षेत्रात पण त्यांनी अतिशय धाडसानं पाऊल टाकून दाखवलं.  संदीप खरे आणि बेला शेंडे ने सादर केलेला प्रवेश, शौनक अभिषेकी आणि सुबोध भावेंनं केलेला प्रवेश, शर्वरी जमेनिस आणि सुबोध नं सादर केलेलं दमदार द्वंद्वगीत…… एकदम झकास !!!  साडेतीन तासांचा हा कार्यक्रम कधी संपला कळलंच नाही.  नेहेमीपेक्षा एका अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद मिळाल्यामुळे सगळे जण अगदी तृप्त झाले.

महाराष्ट्र मंडळाच्या समितीनं अतिशय धावपळ करुन हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार !

ही सगळी कलाकार मंडळी समितीच्या आदरातिथ्याने अतिशय भारावून गेली होती.  कारण मी जेव्हा बेला शेंडेंना जाताना विचारलं की कसं वाटलं आमचं कुवेत….आवडलं की नाही….. तर त्यांचं उत्तर होतं “कुवेत मधली माणसं जास्त आवडलीत”  ह्या उत्तरातच सगळं आलं !!

 

अंतर

April 29, 2008 at 12:27 pm | In मनातलं...!, मराठी | 4 Comments

कितीक हळवे…. कितीक सुंदर
किती शहाणे अपुले अंतर

आत्ताच ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या…..अगदी आत पर्यंत भिनत गेल्या.  दोघांमधले हे अंतर कितीवेळा असे शहाणे असते….!! कधी हे अंतर अगदी आरपार छेदून जातं तर कधी युगं लोटून जातात पण पार करता येत नाही.  कधी हे अंतर ..अंतर वाटतंच नाही.  इतकी दोघं एकमेकांच्या जवळ येतात. एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात.   कधी एकमेकांच्या जवळ पोचायला सुद्धा कोणी तरी बांधून दिलेल्या पुलाची….सेतूची गरज लागते.  कित्येकदा तो बांधून दिलेला पूल मोडकळीस येतो….. त्याला गोंदण-शिंपण करुन नेटका करता करता जीव मेटाकुटीला येतो.  सगळी धडपड त्या सेतूच्या डागडुजीसाठी.  पण ती डागडुजी करताना ती पलीकडली व्यक्ती कितीतरी दूर निघून गेलेली असते.  मग पुन्हा धडपड त्या कशाबशा सावरलेल्या पुलावरुन तोल सांभाळत “त्या”च्याजवळ पोचायची. 

कधी हे अंतर हवंहवंसं वाटतं.  थोडी दूरिया भी नजदीकिया लाती है असं म्हणतात ना…..!  अंतर हे असतंच पण ते किती असावं म्हणजे ते शहाणं म्हणता येईल….! जेव्हा तो अनोळखी असतो तेव्हाचं अंतर….. जेव्हा तो थोडा कळायला लागतो तेव्हाचं अंतर….. जेव्हा तो आपला होतो तेव्हाचं अंतर ……जेव्हा तो कळूनही कळला नाहीये हे जाणवल्यानंतरचं अंतर…. तो जवळ असूनही ते फ़क्त एका कुशीचं जीवघेणं अंतर….. !!

तसं म्हटलं तर आपण सगळे हे अंतरच पार करत असतो.  सगळी धडपड ह्या अंतरासाठीच तर असते.  वेगवेगळ्या नात्यातल्या अंतरामधले वेगवेगळे पूल सतत बांधत असतो, त्याची डागडुजी करत असतो तर कधी स्वत:च्याच हाताने तो मोडून सुद्धा टाकत असतो.  कधी काही पूल तुटत असतात तर कधी नवे सेतू तयार होत असतात.  कधी पडझड तर कधी नवी उभारी.  पण त्या प्रत्येक पडलेल्या पुलाची एक तरी वीट असतेच जपून ठेवलेली नव्या पुलाच्या उभारणीसाठी.  त्या पडझडीतून वाचलेली एक तरी अशी भिंत असतेच तडा न गेलेली. ती कायमच तयार असते नव्या बांधासाठी.  कदाचित त्या भिंतीचाच आसरा शोधत असतो एखादा नवा पूल…….!!

कधी एक अंतर पार केल्यावर असं लक्षात येतं की हे अंतर पार करायच्या नादात आपण बाकी अंतरं फ़ारच वाढवलीयेत.  फारच ताणल्या गेलेत बाकीच्या पुलांचे दोर……!!  तो ताण सैल करायला जावा तर जवळचा असलेला तो दूर जाणार….! कधी हा सगळाच ताण असह्य होतो….!! सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही.  काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….!  त्यांच्यात कसलंतरी जबरी संमोहन असतं जे सगळ्यांना त्याच्याशी चुंबकासारखं बांधून ठेवतं.  मग धडपड सुरु रहाते ती बाकीच्यांची……त्याच्यासोबत चालत रहाण्याची.  हे असं जगता यायला हवं….!! म्हणजे पूलही बांधायला नकोत…. त्याची डागडुजीही करायला नको. 

अंतर अपुले असे निरंतर
जरा हसावे.. जरा रुसावे
कधी ओलावा कधी दुरावा
शोधत जावे… गवसत जावे 

“सारे तुझ्यात आहे”…..१२

April 11, 2008 at 7:02 am | In मराठी, सारे तुझ्यात आहे | 8 Comments

१८ तारीख…..अवी आणि अद्वैत सकाळी ४ वाजता मुंबईत पोचले.  त्या लोकांना काय काय सांगू आणि काय नको असं झालं होतं.  मी आणि अर्चना प्रचंड एक्साईटेड आणि प्रकाश तितकेच शांतपणे सगळे प्लॅन्स समजावून सांगत होते.  दुस-या दिवशी सगळी नागपूरची मंडळी पोचणार होती.  माझी लेक अदिती, माझ्या दोघी नणंदा, त्यांचे नवरे, मुलं……. २० ला भाऊ आणि वहिनी.  अगदी लग्नघर वाटत होतं अर्चना-प्रकाशचं घर.  आम्ही बाकीही सगळी व्यवस्था अगदी चोख ठेवली होती.  सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत, मधलं खाणं……… सगळं आंग्रे बाईंना करायला सांगितलं होतं.  त्यामुळे किचन मधे जायची कुणालाच गरज नव्हती.  सगळे मिळून फ़क्त मज्जा करायची होती.

१९ ला सगळी मंडळी पोचली……. हास्यकल्लोळात फ़क्त छप्पर उडायचं राहिलं.  जेवणं झाल्यावर आम्ही हॉलवर जायला निघालो…. थोडीशी कामं पण बाकी होती.  हॉलच्या तयारीवर शेवटला हात फ़िरवला.  आमचं बॅनर अगदी दिमाखात झळकत होतं दादर-माटुंगा कल्चरल सेंटरवर.  आता खरंच खूप समाधान वाटत होतं. 

घरी आल्यावर पुन्हा एकदा चेक लिस्टवर नजर फ़िरवली.  सगळ्यांना कामं वाटून दिली.  प्रत्येकाला सगळं सामान दाखवून दिलं.  रात्री मात्र अजिबात डोळ्याला डोळा लागला नाही. 

२० तारीख.  The D’Day  :)   पटापटा सगळं आटोपलं.  नाश्ता, आंघोळी, जेवणं…. दुपारी साडे-तीनला घरातून सगळे निघालो.  हॉलवर बरीचशी तयारी झालेली दिसत होती.  होता होता स्टेज सजलं.  आमचीही सजावट सुरु होती.  एकीकडे गणपतीचा फ़ोटो, समई, तेल , वाती, मेणबत्ती…….. दुसरीकडे पुष्पगुच्छ, गिफ़्ट्स, ट्रे, पाणी ही तयारी.  सभागृहात आमचे फ़ोटो, पोस्टर, सीडी विक्रीचा स्टॉल, चहा, पाणी.  मग आमची तयारी. 

हळुहळु लोक यायला सुरवात झाली.  सगळ्यात पहिले प्रसन्न शेंबेकर येऊन भेटून गेला.  नागपूरला जायच्या आधी तो अगदी आवर्जून भेटून गेला.  सुरवात तर छान झाली होती.  माझा सगळा मित्रपरिवार, अभिजीत, त्याचे आई-बाबा…. सगळ्यांचा उत्साह अगदी ऊतू जात होता.  साऊंड वाले, फ़ोटो, व्हिडिओ शूटिंगवाले आपापली जागा घेऊन सज्ज होते.  वैशाली सामंत सगळ्यात पहिले आल्या.  मग पाठोपाठ देवकी ताई पंडित, अशोक पत्की आणि स्वप्निल बांदोडकर आणि त्यांच्या पत्नी.  फ़ाऊंटन म्युझिक कंपनीचे कांतिभाई ओस्वाल अविनाश खर्शीकरांसोबत आले.  प्रशांत लळीत आमच्या विनंतीवरुन अशोक पत्कींना आणायला प्रकाश सोबत गेला होता.  संदेश, अभिजीत, प्रशांत आपापल्या पत्नीसोबत आले होते. मनिष कुळकर्णी आमच्या अल्बमचा मुख्य वादक, सत्यजीत, सौरभ… ह्यांची उपस्थिती मनाला खूप आनंद देत होती.   सगळा गोतावळा बघून अगदी भरुन येत होतं.

हेमंतने सगळ्या उपस्थितांचं स्वागत केलं.  अभिजीतने आपल्या गोड आवाजात गणेश वंदना म्हणून कार्यक्रमाला पवित्र सुरवात केली.  त्यानंतर कार्यक्रम सुरु झाला.  माझ्या एका प्रचंड मोठ्‍या, महत्वाकांक्षी स्वप्नाचं हे मूर्त स्वरुप होतं.  गप्पागोष्टींच्या स्वरुपात कार्यक्रम पुढे सरकत होता.  स्वप्निल चं “आभास चांदण्याचा” हे गाणं एक वेगळीच वातावरण निर्मिती करुन गेलं.  त्यापाठोपाठ वैशाली सामंत आणि देवकीताईंचे सूरही आपापलं साम्राज्य गाजवून गेलेत.  सीडी प्रकाशनाची वेळ झाली.  अशोकजींनी आपल्या शुभहस्ते सीडीचं प्रकाशन केलं.  त्यावेळी आईची खूप आठवण आली.  ती तिच्या तब्येतीमुळे येऊ शकली नव्हती.  आज तिला,  बाबांना किती आनंद झाला असता….!!

सीडीचं प्रकाशन झाल्यावर सगळ्या वादक, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचा अशोक पत्कींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  अशोकजींनी सीडीबद्दल गौरवोद्गार काढले.  माझ्या, अभिजीत च्या कामाची प्रशंसा केली आणि शुभेच्छा दिल्यात.  वैशाली, देवकी ताई, स्वप्निल …सगळ्यांनीच संपूर्णं प्रोजेक्टची तारीफ़ केली….. अगदी धन्य धन्य वाटलं.  कांतिभाईंचे विशेष आभार मानण्यात आले.  त्यांनीही सगळीच गाणी आवडल्यामुळे ही सीडी आपल्या बॅनरखाली प्रकाशित करायचा विचार केल्याचं सांगितलं.

शेवटी माईक माझ्या हातात आला.  आभारप्रदर्शनाचं काम करायला मी उभी राहिले.  माईक हातात घेतल्यावर फ़क्त त्या दोन मिनिटात मी सगळा प्रवास मनात पुन्हा एकवार करुन आले.  मनात खूप आठवणी दाटल्या होत्या.  ह्या प्रकल्पात मला ज्या ज्या लोकांची मदत झाली…… त्या त्या लोकांचे मनापासून आभार मानले आणि कार्यक्रम संपला.  एका स्वप्नाच्या परिपूर्णतेपर्यंतच्या प्रवासाची आज सांगता  झाली होती. 

सगळे लोक भेटायला आले.  शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव आम्ही सगळे झेलत होतो……तॄप्त होत होतो.  हा प्रवासाचा अंत नक्कीच नव्हता…… आता कुठे प्रवासाला सुरवात झाली होती :)

“सारे तुझ्यात आहे”…..११

April 10, 2008 at 10:09 am | In मराठी, सारे तुझ्यात आहे | No Comments

रोजचा दिवस काहीतरी नवीन काम घेऊन उजाडत होता.  आता पुन्हा एकदा हॉलची चक्कर करायची होती.  काय काय कुठे कुठे आहे……..कुठे कुठे ठेवायचं….काय काय सोयी आहेत….काय करवून घ्याव्या लागणार आहेत हे सगळं ठरवायचं होतं. तिथल्या डेकोरेटरशी बोलून सगळं फ़ायनल करायचं होतं.  मी आणि अभिजीत दुपारी पोचलो.  सगळं नीट बघून पक्कं केलं.  तिथल्या लोकांनी सुद्धा फ़ारच उपयुक्त सल्ले दिले.  तिकडून आम्ही फुलमंडईत गेलो.  मनासारखं ते ही काम झालं.  तो हॉलवरच गुच्छ पोचवणार होता. 

बाकी बरीचशी बारीक सारीक खरेदी करुन आम्ही हेमंत बर्वेला भेटायल गेलो.  कार्यक्रमाबद्दल त्याच्याशी सविस्तर चर्चा केली.  कार्यक्रमाचं स्वरुप काय असावं…… कसं असावं…..त्याला त्यासाठी जी काय माहिती हवी होती ती पुरवली.  आता मन थोडं शांत झालं होतं.  बरीचशी कामं आटोपली होती.  शिवाजी पार्कच्या उद्यान गणेशाचं दर्शन घेतलं…. तिथे आमचं मोठं पोस्टर आणि आमंत्रण पत्रिका लावली नंतर  आमच्या टिव्ही वाल्या दोस्तांची भेट झाली.  ह्यात प्रणेश जाधव होता.  ही मुलं शिकता शिकता बरंच काही करतात.  त्यांनीच ईटिव्ही वाल्यांशी बोलून आमचं आमंत्रण त्यांच्यापर्यंत पोचवलं.  कितीतरी लोकांची आम्हाला मदत झाली.  सहारा चॅनेल साठी प्रकाशचा मित्र पांडा आणि त्याची बायको मदतीला आले.  झी २४ तास चं काम तुषार शेटे ने केलं.  वर्तमान पत्राचं काम श्रीकांतजी आंब्रेंनी अतिशय आपलेपणाने केलं.  त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन पण केलं.  सगळ्यांचाच आपलेपणाचा, मोलाचा आणि प्रेमाचा वाटा होता आमच्या ह्या पूर्ण संकल्पात.

१७ तारीख उजाडली. मी आणि अभिजीतनं चार्ट पेपर्स वर आमच्या अल्बमचा जिवंत प्रवास रेखाटला.  सोबत माझ्या काव्यरचना.  सगळं सुबक रचून सजवलं.  संपूर्ण दुपार त्यातच गेली.  ते सगळे फ़ोटो बघताना आम्ही केलेल्या प्रवासातल्या गमती जमती आठवल्या….. मन पुन्हा एकदा ताजंतवानं झालं.  आज आम्हाला अजून एक महत्वाचं काम करायचं होतं.  आज वैशाली सामंत भेटणार होत्या.  पण त्यांची भेट होऊ शकली नाही.  पण त्यांचं आमंत्रण आणि सीडी मात्र आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे बझ-इन मधे पोचवली.  तिथे सत्यजीत भेटले.  पुन्हा एकदा रेकॉर्डिंगच्या सुखद आठवणींना उजाळा मिळाला.  आम्ही खरंच खूप मज्जा केली होती.  सत्यजीत आणि सौरभ सुद्धा अगदी मनापासून सगळ्यात सामील होते.  त्यांनाही हे काम करण्यात खूप मज्जा आली असं ते बोलले……. खूप छान वाटलं. 

तिकडून आम्ही माहिमला गेलो अभिजीत नार्वेकर आणि त्यांच्या पूर्ण गॅंगला आमंत्रण द्यायला.  त्यांच्याशी पण घट्ट दोस्ती जमली होती.  त्यांच्या नव्या कंपोझिशन्स आणि गप्पा करता करता  मस्त वेळ गेला.  घड्‍याळाकडे बघितल्यावर मात्र वेळेची जाणीव झाली.

“सारे तुझ्यात आहे”…..१०

April 9, 2008 at 9:26 am | In मराठी, सारे तुझ्यात आहे | No Comments

प्रकाश आणि अर्चना आले होते विमानतळावर घ्यायला.  ह्या दोघांमुळेच मी इतका मोठा उपद्व्याप करु शकले.  त्यांच्या मदतीबद्दल जितकं लिहावं तितकं कमी आहे.  पोचल्यावर थोडा आराम झाल्यावर डोळ्यासमोर सगळी कामं दिसायला लागलीत.  अभिजीत शी बोलून कशी सुरवात करायची ते ठरवलं.  देवकी ताई, स्वप्निल आणि अशोक पत्कींना घरी जाऊन आमंत्रण द्यायचं होतं.  २-३ दिवसात कांतिभाई त्यांच्या मुंबईच्या ऑफ़िसमधे सीडीज, पोस्टर्स आणि आमंत्रण पत्रिका पाठवणार होते.  त्या मिळाल्याशिवाय गायक मंडळींकडे जाता येणार नव्हते.  तोपर्यंत बाकीची तयारी सुरु होती.  सगळ्या गायक, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचा सत्कार करणार होतो त्यामुळे त्याची तयारी.  भरपूर याद्या तयार होत होत्या ….सामान आणलं जात होतं.  पिशव्यांवर नावं घालून तयार पिशव्या घरात एका कोप-यात साठत होत्या.

कांतिभाईंनी कबूल केल्याप्रमाणे सगळं सामान पाठवलं.  मी आणि अभिजीत सगळं सामान तिकडे जाऊन घेऊन आलो.  आमच्या इतक्या दिवसांच्या धावपळीचं सार्थक झालं होतं.  अतिशय सुरेख पॅकिंग मधे आमचं स्वप्नं समोर दिसत होतं.  आम्ही दोघांनीही देवाचे आभार मानले.  ज्यांची ज्यांची मदत झाली त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले मनात.  ते गोड ओझं घरी घेऊन आलो.  आज खूप थकलो होतो तरी थकवा अजिबात जाणवत नव्हता.

दुस-या दिवशी सकाळीच आम्ही निघालो.  सगळ्यात पहिले स्वप्निल बांदोडकरांकडे.  त्यांना आमंत्रण पत्रिका आणि ट्रॅक्स असलेली त्यांची गाणी त्यांना देऊन मग आलो अशोक पत्कींकडे.  अशोकजींनी फ़ारच छान केलं स्वागत.  आम्ही त्यांनाही आमंत्रण पत्रिका आणि सीडी देऊन आलो देवकी ताईंकडे.  आतापर्यंत आम्ही खूप मोकळे झालो होतो त्यांच्याशी.  दोनदा घरीही जाऊन आलो होतो. खूपच छान बोलतात त्या.  त्यांचं बोलणं अगदी ऐकत रहावसं वाटतं.  प्रत्येक वेळी त्यांना भेटून काहीतरी अजून करायला हवं अशी भावना तीव्रतेने जाणवली.  खूप कळकळीने बोलतात त्या संगीताविषयी.  त्यांच्याकडून आम्हाला खूपच उत्तेजन मिळालं. 

वैशाली मात्र मुंबईत नव्हती.  तिची भेट थेट १७ लाच होणार होती.  आमची बाकीची तयारी सुरुच होती.  आमचं बॅनर बनवलं अभिजीतच्याच अजून एका टॅलेन्टेड मित्रानं.  प्रणव धारगळकर नं.  आतापर्यंत अभिजीतने ज्या ज्या कुणाला मला भेटवलं तो तो प्रत्येक मित्र जबरदस्त कलाकार होता आणि तरीही अतिशय साधा.  काय लाघवी गोतावळा होता अभिजीतचा.  मला पण त्यांनी त्यांच्यात लगेच सामावून घेतलं.  तर हा प्रणव सुद्धा एक उच्च कलाकार.  त्यानेसुद्धा अगदी धडपड करुन आम्हाला सुरेख, स्टेजला भारदस्तपणा आणणारं, अगदी आमच्या मनासारखं बॅनर बनवून दिलं.  ऑफ़िसमधून आल्या आल्या चक्क रात्री साडे-नऊ पर्यंत तो आमचं काम करत होता. 

जीवाला जीव देणारी माणसं जोडली आहेत ह्या अभिजीतनं.  ह्याला कारण त्याचे संस्कार.  त्याचे आई-बाबा सुद्धा इतके प्रेमळ आहेत ना…. मला तर त्यांनी अगदी स्वत:च्या मुलीसारखं प्रेम दिलं आणि मी ही मस्तपैकी हक्काने सगळे लाड करवून घेतले.  चिकन काय, फ़िश फ़्राय काय….. काकूंनी अतिशय प्रेमाने खाऊ घातलं.  काकांबद्दल काय बोलावं.  प्रचंड वाचन आहे त्यांचं.  शब्दप्रभू आहेत ते.  कायम त्यांचं काहीतरी लिखाण सुरु असतं.  अगदी मनापासून कौतुक करणारे, खूप खूप हळवे.  प्रत्येक आनंदाच्या क्षणी, टेन्शन्च्या वेळी काकू-काकूंचा आम्हाला खूपच आधार होता.  मी, अभिजीत, प्रकाश अर्चना, काका, काकू…… आम्ही सगळेच ह्या प्रोजेक्ट मधे आकंठ बुडालो होतो.

Next Page »

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.