शुभ्र काही जीवघेणे

जानेवारी 13, 2010 at 11:20 सकाळी | In नुकतंच वाचलेलं | 2 Comments

अंबरीष मिश्र ह्यांचं “शुभ्र काही जीवघेणे” हे पुस्तक नुकतंच वाचलं.  पुस्तकाचं नाव वाचूनच आत काहीतरी झालं.  पुस्तक नक्कीच काहीतरी खास असणार असं वाटलं.  अंबरीष मिश्र ह्या लेखकानं मराठीत इतक्या सुंदर नावाचं पुस्तक लिहावं…म्हणजे थोडं आश्चर्यच वाटलं.  थोड्याशा कुतूहलानेच पुस्तक वाचायला घेतलं आणि लेखकाची पुरती फॅन झाले.

काही मनस्वी कलाकारांबद्दल ह्या लेखकाने असं काही लिहिलंय ना……. की त्या कलावंताच्या प्रेमात पडावं की लेखकाच्या…… ह्याच संभ्रमात पडायला होतं.  लिखाण असं काही काळजात घुसतं ना…..!! शोभा गुर्टू, अख्तरी बाई, सादत हसन मंटो, ओ.पी नय्यर, पार्श्वनाथ आळतेकर आणि पंकज मलिक ह्या काहिशा मनस्वी कलाकारांचं, त्याच्या अफाट कलेचं इतकं काही सुरेख वर्णन त्यांनी केलंय ना…….की आपण तर त्या कलावंताइतकंच लेखकाच्या भाषेवरही फिदा होतो.

शोभा गुर्टू – बाईंनी कजरी किती सजवायची……मधेच मियामल्हारात प्रवेश करुन दोन्ही निषादांना हलकेच छेडायचं अन परत देसात शिरायचं.  शेवटी बाईंनी व्याकुळ वृंदावन सारंगची ओढणी कजरीभोवती अल्लद लपेटून टाकली अन कदरदानांच्या जीवाला कायमची चुटपुट लागून राहिली.

केरवातली “मोरे सैया बेदर्दी बन गये” ही बंदिश बाईंनी इतक्या तब्येतीने पेश केली की घाव अद्द्याप ताजे आहेत.  हंसध्वनी  आणि शंकराचा सुभग मिलाफ करुन बाईंनी कलाकभरात असं काही शिल्प घडवलं की स्वत: तर वेडावल्याच पण ऐकणा-यालाही खुळावून टाकलं.

अख्तरी बाई – केवळ एका पिढीचंच नव्हे तर समस्त आयुष्याचं दु:ख अख्तरीबाईंनी सुरेल करुन सांगितलं.  अख्तरीबाईंच्या षड्जात करुणेचा लसलसता कोंब आहे.  आदिम दु:खाचं तेजाब आहे अन हे तेजाब पचवून टाकण्याची झिंग आहे.  ”खालीही सही, मेरी तरफ जाम तो आया”, असा फकिरी नशा आहे अन पुन्हा वर दशांगुळे उरणा-या आयुष्याशी जाबसाल करण्याची कलंदरी आहे.

अख्तरीबाईंच्या गायकीतला सगळ्यात उन्मेषदायी भाग म्हणजे त्यांच्या आवाजातली पत्ती.  फुलात केशर, तशी अख्तरीच्या आवाजातली पत्ती.  हरकत, मुरकी घेताना किंवा मध्या-निषादमधे फिरताना बाईंचा आवाज इतका सुरेख चिरकायचा की पुछो मत !  यालाच बुजूर्ग “पत्ती” म्हणतात.  बरं ते नुस्तं चिरकणं नव्हतंच…..काही औरच होतं…. मंतरुन टाकणारं ! पुन्हा ही पत्ती लागेल तेव्हा लागेल……असा मामला होता.  त्यात प्रोग्रॅमिंग नव्हतं.  एखाद्या बेसावध क्षणी अशी जालिम पत्ती लागायची की ऐकणा-याच्या साक्षात वर्मी वार बसायचा.  पानात ठंडकचे काही कण जास्त पडले तर जीवाची कशी सुरेल तगमग होते…..तसं व्हायचं.

सादत हसन मंटो –  मंटो रुखरुख लावून गेला.  आरपार संध्याकाळी पश्चिमेतून एका निनावी नक्षत्राने आकाशाकडे झेप घ्यावी, दिशादिशातून आपलं प्राणतेज लुटून टाकावं आणि चांदण्याची मैफल भानावर येण्यापूर्वी समुद्राच्या निबिड मौनात लुप्त व्हावं, तसं मंटोचं झालं.

आयुष्यभर पेटत राहिला……डोंबवणव्यासारखा, अटीतटीने.  याचं जगणं हिंस्त्र अन भूताळ ! हा समरसून जगला…..ताकदीनं लिहित राहिला.   शब्द कसले. पेटते पलितेच जणू ! उर्दू साहित्यातल्या गुलजार फुलबागा याने जाळून टाकल्या अन त्याची राख अंगभर फासून उत्सव केला.

ओ.पी.नय्यर – माझ्या पुरुषार्थावर नियती भाळली.  तिच्या जुगारी, लहरी स्वभावावर मी फिदा.  आमचं हे लव्ह-अफेअर दहा वर्ष टिकलं.  ही दहा वर्ष मी अक्षरश: सोन्यानं मढवून काढली.  इंडस्ट्रीनं डॊक्यावर घेतलं.  यश, पैसा, किर्ती, सुंदर बायकांचा सहवास….सगळं सगळं उपभोगलं, यथेच्छ.

पार्श्वनाथ आळतेकर - रंगभूमीच्या इश्कात पार्श्वनाथ आरपार पिंजून निघाले.  तबाह झाले.  त्यांचे हे दुर्घट, प्रमाथी प्रेम रंगभूमीनं साफ झिडकारलं.  आळतेकर दुर्देवाभोवती घुटमळत राहिले,  हरपलेले श्रेय धुंडाळत राहिले.

पुस्तक वाचून झाल्यावरही भाषेचा प्रभाव अगदी तसाच मनात दरवळत राहतो आणि  लेखकाच्या भाषेच्या कलाकुसरीवर जीव जडतो.

आवर्जून वाचावं असं पुस्तक !

आहे मनोहर तरी

नोव्हेंबर 28, 2009 at 9:41 सकाळी | In नुकतंच वाचलेलं | 4 Comments

सुनिता देशपांडे ह्यांचं “आहे मनोहर तरी” हे पुस्तक फार पूर्वी म्हणजे अगदी शाळकरी वयात वाचलं होतं. त्यावेळी त्यांचा खूप राग आला होता…की आपल्या पु.ल.देशपांडेंबद्दल असं कसं काय लिहिलं त्यांनी. म्हणजे तसं काही वाईट लिहिलं नव्हतं पण ….तरीसुद्धा आतून कुठे तरी वाईट वाटलं होतं. आता लग्न होऊन स्थिरस्थावर झाल्यानंतर…. नवरा-बायकोचं खरं नातं कळल्यानंतर…. थोडी परिपक्व झालीये असं वाटल्यानंतर….. अगदी ठरवून पुन्हा एकदा वाचलं हे पुस्तक आणि अगदी मनापासून भिडलं मनाला.

आपण कधी कधी फक्त एकाच बाजूने विचार करतो आणि तोच बरोबर आहे असं गृहीतही धरतो. पण जेव्हा दुसरी बाजू आपल्याला कळते तेव्हा मात्र ओशाळल्यासारखं होतं. अगदी तस्संच झालं. सुनिताताईंचा मोठेपणा कळायला वयाची चाळीशी उलटायला लागली.

नुकतंच निधन झालं सुनिताताईंचं. त्यामुळे त्यांच्याबद्दल कितीतरी न माहित असलेली माहिती कळली…..आणि तेव्हाच पुन्हा हाती आलेलं हे पुस्तक….!! स्वत:चीच लाज वाटली ! इतके दिवस उगाचंच आपण त्यांचं मोठेपण समजून न घेता त्यांच्याबद्दल वेगळं मत करुन घेतलं. पुस्तक पुन्हा वाचताना त्यांच्याबद्दलचा आदर वाढत गेला.

अतिशय प्रांजळ लिखाण…!! अगदी सहजपणे केलेली मोठमोठी कामं… स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणाची आवड, व्यवहारी आणि काटेकोरपणा….हाती घेतलेल्या कुठल्याही कामात झोकून देण्याचा स्वभाव…..आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पु.लं बद्दलचं विलक्षण प्रेम आणि आदर….सगळं सगळं……कुठलाही आविर्भाव न आणता उतरलेलंय.

स्वत:चा गाढवपणा कबूल करावा म्हणतात. इतक्या मोठ्या व्यक्तिवर उगाचंच राग धरला ह्याचं फार वाईट वाटतंय. खरं म्हणजे माझ्यासारख्याने त्यांच्यावर राग धरणं किंवा न धरणं ह्यानं काहीच फरक पडत नाही. पण अगदी मनापासून स्वत:ची चूक मान्य करावीशी वाटतेय इतकंच. आता पु.लं. सोबतच सुनिताताईंची पण मी मोठी फॅन झालेय एव्हढं मात्र खरं.

पंच्याहत्तरी….माझ्या सुपर मॉमची !!

ऑगस्ट 9, 2009 at 11:42 सकाळी | In मनातलं...! | 5 Comments

हो हो सुपर मॉम हेच नाव अगदी योग्य आहे.  माझी आई जगातली सगळ्यात आगळी-वेगळी आई आहे. तसं म्हटलं तर प्रत्येकालाच असं वाटायचा हक्क आहे पण तरीसुद्धा माझ्या आईचा एक गुण नक्कीच जास्त असणार सगळ्या आयांपेक्षा :)

तिचं लग्न थोडं उशीरानेच झालं आणि त्यात अस्मादिकांनी ह्या जगात यायला चक्क १२ वर्ष घेतली.  म्हणूनच आई मला तिची आणि बाबांची “तपश्चर्या” म्हणते.  माझ्यानंतर चार वर्षाने राजू आणि मग २ वर्षाने प्रसाद.  म्हणजे आमच्या पंचकोनी कुटूंबाला पूर्ण व्हायला तब्बल १८ वर्ष लागली.  आई आणि बाबा दोघेही प्राध्यापक.  आई तिच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजे खेळाच्या क्षेत्रात आणि बाबा व्हेटरनरी डॉक्टर.

आईचं माहेर अमरावतीचं.  खूप मोठा परिवार…घरी दूधदुभत्याचा व्यवसाय.  लहानपण अगदी चैनीत नाही तरी सुस्थितीत गेलं.  मनासारखा जोडीदार मिळाला.  लग्नानंतर बी.ए., एम. ए. आणि नंतर बी.पी.एड. केलं….. आम्हा तिघांनाही सांभाळून.  अर्थात बाबांचा पूर्ण पाठिंबा होताच.  पण घरचं सगळं सांभाळून हे सगळं करणं म्हणजे गंमत नव्हती.  ही तारेवरची कसरत तिने अगदी लीलया केली.

आईला पहिल्यापासून स्वच्छता, नीटनेटकेपणाची आवड.  त्यामुळे इतक्या धावपळीत सुद्धा आमचं घर अगदी लख्ख असायचं आणि ते ही त्यात आमचा काहीही सहभाग नसताना.  खरं तर मी घरात सगळ्यात मोठी पण कायम आपल्याच विश्वात.  भरपूर activities मधे कायम बुडालेली….अर्थात आईच्याच हौशीमुळे.  घरात मात्र काडीचीही मदत नव्हते करत.  आईच आपली डोकं वगैरे दुखत असलं तरी डोक्याला पट्टी वगैरे बांधून सैपाक घरात.  मला चांगलंच माहीत होत की आईला खुश कसं करायचं.  मी छान काहीतरी विणायला किंवा पेंटींग वगैरे करायला घेतलं की आई एकदम खुश :) मग तिची डोकेदुखी वगैरे पळून जायची.

लहानपणापासूनच तिला विणकाम, भरतकाम, शिवणकाम मनापासून आवडायचं.  त्यातल्या त्यात कच-यातून कला हा तर तिचा आवडता विषय.  टाकावू वस्तू तिने कधीच फेकू दिल्या नाहीत.  त्या वस्तूंचा अतिशय कलात्मक वापर करुन ती इतक्या सुरेख  वस्तू बनवायची ना….!! त्यामुळे तिला जर खुश करायचं असेल तर काय करायचं हे आम्हा दोघी बहिणींना चांगलंच माहित होतं.

आईचं प्रत्येक काम इतकं व्यवस्थित असायचं ना….!! कुठलंही काम इतकं मन लावून करणार की बघणा-याने दाद द्यायलाच हवी.  पूजेची तयारी करावी तर आईनेच.  घरी गणपती, महालक्ष्म्या असायच्या.  आम्ही किडूक-मिडूक मदत करायचो तिला.  पण बाकी सगळी तयारी  म्हणजे पेट्यांमधून मुखवटे, धडं वगैरे काढून,  त्याला ऊन दाखवायचं, फुलोरा करायचा, बाकी सगळी सैपाकाची तयारी, कोथळे भरणं, महालक्ष्म्यांना सजवणं, सभोवतीची आरास, लाईटींग,  मागे तिनेच विणलेला पडदा लावणं….. ही सगळी कामं अगदी सहज करायची !!

हाताला प्रचंड उरक.  कुठे सांडलवंड नाही, पसारा नाही की बोभाटा नाही.  भल्या पहाटे उठून सडा, रांगोळी करणार….. आमची खाणी करुन ग्राऊंडवर कॉलेजच्या मुलींची प्रॅक्टीस घेणार.  आल्यावर सैपाक, आमची शाळेची तयारी, आम्ही गेल्यावर बाबांचं जेवण, डबा……बाबांना जातांना अगदी दरवाज्यापर्यंत सोडणार……अगदी न चुकता !! एखाद्यावेळी जर ती आत कामात असेल तर बाबांची पण आतबाहेर  होणार :) बाबा गेले की मग आई जेवण उरकून स्वत: स्कूटरवरुन कॉलेजमधे जाणार.  हो….. माझी आई स्कूटर चालवायची….आम्हा भावंडांना त्याचा प्रचंड अभिमान होता :)

दिवसभर कॉलेजमधे टीम्स तयार करणं, लेक्चर्स घेणं….. त्यातही एखादा पिरीयड मोकळा मिळाला की आर्ट्सच्या मुलींना वीणकाम, भरतकाम शिकवणार.  तिच्या कॉलेजच्या जिमखान्यात चक्क मेळा असायचा मुलींचा तिच्याभोवती.  मुलींकडून पण काही नवीन शिकायला तयार…… आजतागायत.  चक्क पंच्याहत्तरीची झालीये….. तरी कुठलीही नवी गोष्ट दिसली की ती कशी केली असेल ह्याची उत्सुकता तिच्या डोळ्यात अगदी तश्शीच !!  तेवढ्याच उत्साहात ती नमुना करुन घेणार…..!! इतका उत्साह कसा आणि कुठून आणते….देवच जाणे.

घरी आल्यावरही तिला कधीच स्वस्थ बसलेलं आम्ही बघितलं नाही.  आल्यावर घराची आवरासावरी, बाबांचा चहा….सोबत दिवसभरातल्या घडामोडींची देवाणघेवाण.  मग सैपाक करता करता आम्हा तिघांचाही अभ्यास.  मला अगदी लख्ख आठवतंय……! आमच्या बरोबरीनं ती पण अभ्यास करायची.  पाढे पाठ करताना…ती आमच्याशी शर्यत लावायची…..कोणाचं आधी होतं…… ती मुद्दाम हरायची आम्हाला जिंकवण्यासाठी.  जास्तीचा अभ्यास करता यावा म्हणून कितीतरी पुस्तकं विकत आणायची.  शिवाय इतर वाचनासाठी तर चिक्कार मासिकं लावली होती.  चांदोबा, किशोर, कुमार, चंपक, मुलांचं मासिक, बालविहार….. कितीतरी !  सकाळी पेपरसोबत ती मासिकं यायची.  जो आधी उठेल त्यालाच ती मिळायची.  मग काय … आधी वाचायसाठी केलेली ती भांडणं…. काय धम्माल होती ती !!

शाळेत आमच्या बाई आणि सरांना अगदी नियमितपणे भेटायला यायची.  हे सगळं ती कसं करायची देवच जाणे !! आणि आई हे सगळं करते म्हणून बाबा पण एकदम रिलॅक्स्ड असायचे.  त्यांना पण माहित होती आपल्या बायकोची सुपर पॉवर :)

मला अजूनही माझ्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा आठवतात.  परिक्षेला जाताना त्यावेळी रिक्षा लावली होती.  पण आईचं काही समाधान व्हायचं नाही.  ती रिक्षाच्या मागे मागे तिच्या स्कूटरने यायची. अगदी प्रत्येक पेपरला.  मी वर्गात जाऊन बसले की मानेनेच मला “ठीक आहेस ना?” असं विचारुन…. मगच तिचं पाऊल निघायचं.  इतका त्रास कोणी घेतला असेल आपल्या मुलांसाठी ??  आणि हे जे काय करायची ना…..ते सगळं इतकं सहज करायची….. की आम्हाला तशी सवयच झाली.  कुठल्याही समस्येचं निराकरण आईकडे असणारच असा ठाम विश्वास होता आमचा आणि तो तिने नेहेमीच सार्थ ठरवला.

परिक्षा संपल्यावर ती आमचं अगदी कडक वेळापत्रक ठरवणार.  सकाळी सहा वाजता ती स्वत: स्विमिंगला घेऊन जायची.  तेव्हा हडस हायस्कूल मधे असायचा स्विमिंगचा कँप.  मग तिकडूनच मला ती रामनगरला पेंटिंग क्लासला घेऊन जायची.  तिथे २ तास काहीतरी स्वेटर , शाल वगैरे विणत बसायची.  मग १० वाजता आम्ही घरी आलो की स्वैपाक, जेवणं उरकायची.  मग आम्हाला काही तरी शिकवायची.  चादरींवर भरतकाम, साड्‌यावर पेंटींग, कधी टॅटिंग….. आमच्या घरी माझ्या मैत्रिणीही यायच्या आईकडून शिकायला.  मग शिकवता शिकवता आमच्यासाठी मस्त खायला पण करायची.  कच्चा चिवडा, लस्सी, मिल्कशेक……काहीतरी नवीन ! संध्याकाळी मग गाण्याचा क्लास असायचा.  संध्याकाळी आम्हा सगळ्या मुलांना व्हॉलीबॉल, लगोरी, खोखो वगैरे शिकवायची.  कुठून इतका स्टॅमिना आणायची फक्त तीच जाणे.  संध्याकाळी तिच्यासोबत रामरक्षा वगैरे म्हणायची आणि तो अंगारा सगळ्यांना लावायचा.  मग सैपाक, जेवणं….. झोप ! रात्री मात्र फार लवकर झोपायची.  इतकी दगदग झाल्यावर झोप येणारच लवकर ! सकाळ उगवायची पहाटे चार वाजता…..की पुन्हा रहाटगाडगं सुरु !!

बाबा फार लवकर आम्हाला सोडून गेले.  त्यावेळी मी B.Sc.II ला होते. राजू दहावीत, प्रसाद तर फक्त सातवीत.  आईला तर रडायला पण वेळ नव्हता.  बाबांचं पण काम तिलाच करायचं होतं.  आम्ही तिघेही लहान आणि करणारी ती फक्त एकटी ! पण तिने अजिबात हिंमत हारली नाही.  डोळ्यात येणारं पाणी तसंच लपवत आम्हाला मोठं केलं.  आम्हाला इतके छान जोडीदार शोधून दिलेत.  सगळ्यांचे सुखी संसार उभे झाल्यावर मात्र तिला तिच्या थकण्याची जाणीव झाली.  इतके दिवस आणलेलं बळ अचानक ओसरल्यासारखं झालं.  आतापर्यंत हिंमतीने संसाराची झुंज एकटीने लढल्यावर आता तिला एकाकी असल्याची जाणीव तीव्रतेने व्हायला लागली.  इतके दिवस समोर एक ध्येय होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ती जीवाचं रान करत होती.  मुलं आता आपापल्या संसारात खुश होती….रमली होती.  ह्याच साठी केला होता अट्टाहास तिने…… !!

पण आता एकटेपणा खूपच जाणवायला लागला.  बाबांची खूपच आठवण यायला लागली.  त्या आठवणींनी ती खूपच हळवी झाली.  छोट्या छोट्या गोष्टींनी डोळे भरुन यायला लागले.  अजिबात चैन पडेनासं झालं !  मग तिच्या छंदानेच तिला सावरलं.  निटींगच्या मशिन्स घरी होत्याच.  वेळ घालवण्यासाठी ती स्वेटर, शालींच्या ऑर्डर्स घ्यायला लागली.  कामात सुबकपणा आणि सफाई जात्याच असल्यामुळे तिने केलेल्या वस्तूंना फार मागणी वाढली.  मग ती पंजाब मधून लोकर मागवायला लागली आणि शाली करुन देऊ लागली.  बघता बघता तिचा हा वेळ घालवण्यासाठी म्हणून सुरु केलेला छंद…..चक्क व्यवसाय झाला.  तिला शाळेच्या, हॉस्पिटलच्या वगैरे मागण्या यायला लागल्या.  शिवाय ती मुलींना शिकवायला सुद्धा लागली.  आता वेळ मजेत जायला लागला.

ब-याच दुकानात तिने तयार केलेल्या वस्तू मिळायला लागल्या.  आता आई एक बिझीनेस वुमन झाली होती.  हिवाळा म्हणजे तिचा अगदी Peak सिझन !! व्याप वाढला….. पण एकटेपणा हळुच डोकं वर काढायचाच ! किती वेळ गुंतवून घेणार स्वत:ला ! तिन्ही सांजेची वेळ जीवाला हुरहुर लावायचीच ! त्यावेळी राजूने तिला अमेरिकेत बोलवून घेतलं.  थोडा चेंज हवा होताच तिलाही.  अमेरिकेत राजेशच्या काकूंसोबत तिने खूप मज्जा करुन घेतली.  लेक, जावई, नातू ह्यांच्या सहवासात ती आनंदून गेली.  लेकीचं वैभव पाहून सुखावली.  आता कुणाचीच काळजी नव्हती… सगळे आपापल्या संसारात सुखी आणि समाधानी होते.

आता स्वेटर्सचा मात्र कंटाळा आला होता.  मग लक्ष गेलं शिवणकामाकडे.  आधीची मशीन होतीच घरी.  मग नवी फॅशनमेकर घेतली आणि पुन्हा तडाखा सुरु झाला शिवणकामाचा.  आता ती प्रदर्शन पण भरवायला लागली.  अनाथ आश्रमात जाऊन तिथल्या मुलींना शिकवणं, त्यांच्याकडून वस्तू बनवून घेणं, त्यांना त्यांच्या पायवर उभं रहायला मदत करणं…..! हे सुरु झालं.  एकदा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्यात स्वत:ला अगदी झोकूनच द्यायचा हा स्वभाव आणि त्यामुळे कामाचा व्यापही वाढला.  पुन्हा एकदा तीच धुंदी !

पण आताशा शरीर थकायला लागलेलं.  एकटेपणामुळे मन तर आधीच थकलेलं ! त्यातच डायबेटीज, ब्लड प्रेशर, आर्थ्रायटीस ह्यासारखे नव्याने झालेले सोबती….!! एकटं रहाणं नकोसं व्हायला लागलं…पण घर सोडून दुसरीकडे जायची कल्पनाही जीवघेणी वाटायची.  पण इतकी दगदग , तडतड सोसलेलं शरीर कधीतरी तक्रार करणारच ना….!! अचानक हिमोग्लोबिन घसरलं आणि आई आजारी झाली.  आयुष्यात पहिल्यांदा आई आजारी पडली.  कायमच चिरतरुण वाटणारी आई अंथरुणावर बघणं खूपच कठीण होतं.  पण तिची इच्छाशक्ती मात्र तिच्यासारखीच जबरदस्त ! म्हणून पुन्हा ती सावरली………आमची आई पुन्हा आम्हाला मिळाली !!  देवाला हात जोडून धन्यवाद दिलेत.

तिच्या आजारपणात तिच्या सोबत घालवलेला प्रत्येक दिवस अगदी आत जपून ठेवलाय.  तिच्यासोबत खूप खूप गप्पा मारल्या……..तिला तिच्या आवडीचं गरम गरम जेवण खाऊ घातलं…. तिच्याकडून लाडावूनही घेतलं…..पुन्हा एकदा लहानपण उपभोगलं. आज आईचा पंच्याहत्तरावा वाढदिवस….!! आई…… आम्हाला हे जे इतकं सुखी आणि समाधानी आयुष्य मिळालंय ते फक्त तुझ्यामुळे आणि बाबांच्या आशीर्वादामुळे ! आमच्या आयुष्याला तुझ्यामुळेच इतका सुबक आकार आलाय ! असाच तुझा आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असू दे ! तुझा असाच अखंड सहवास आम्हाला लाभू दे !!

माझा परीघ

एप्रिल 22, 2009 at 4:50 pm | In अशी मी | 4 Comments

 मनातलं..खूप खूप आतलं…….!!

माझा परीघ

इतक्या वर्षानंतर सुद्धा तश्शीच आहे नव्हाळी
तशीच कोवळी
काही फांद्या झाल्या असतील थोड्‍याशा जुन्या…
पण आतली ओल मात्र अगदी तश्शीच
भळाभळा वाहणारी !
एक छोटंसं मोग-याचं फुल सतत आसपास असावं…
तसा तुझा सहवास
हवाहवासा, ताजा, गंधाळलेला
इतकी सवय झालीये ना त्याची !!
कधी हेच मोग-याचं फुल अबोली बनतं ना…
तेव्हा मात्र मन कावरंबावरं व्हायला लागतं
अबोलीच्या मनातलं काढून घेणं फार फार कठीण !
पण एकदा का ही अबोली बहरुन गुलाबाची टप्पोरी कळी झाली ना……
की सगळं जगच गुलाबी होऊन जातं माझं !
…..

आता हा गुलाब… आणखीनच डौलदार झालाय
 डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा आलाय
केसातली ती चंदेरी वळणं… 
कानावरचे थोडेसे रुपेरी केस…
जास्तच रुबाबदार दिसतो आहेस !
गालांवरच्या त्या दोन खोल खळ्यांमधे तर मी कोसळतेच आहे कित्येक वर्षापासून !
तुझ्या डोळ्यातली मिश्किली….  माझा श्वास आहे
माझं जगणं, मरणं त्यावर अवलंबून आहे
कायमच एक सखा होऊन राहिलास
माझं बालपण टिकवलंस
वेडेपण गोंजारलंस…
तारुण्य जपलंस….!!
अतिशय समृद्ध आणि तृप्त आयुष्य दिलंस मला
तुझ्या परिघातच आहे माझं जग सारं
ते असंच राहू दे.

तुझी सखी

कुणास्तव कुणीतरी

मार्च 9, 2009 at 12:19 pm | In नुकतंच वाचलेलं, मराठी | 2 Comments

 

मंगेश पाडगावकर ह्यांच्या पत्नी यशोदा पाडगावकर ह्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र “कुणास्तव कुणीतरी”. 

कलावंताचा संसार सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत असं कोणीसं म्हटलंय ते काही खोटं नाही. समाजात अतिशय प्रतिष्ठा मिळवणारा, लोकांच्या गळ्यातला ताईत असलेला नवरा असणं…… हे जरी अप्रूप असलं तरी……. त्याचा संसार सांभळणं तितकंच कठीण. ह्याचा प्रत्यय प्रत्येक यशस्वी नव-याच्या बायकोने लिहिलेल्या पुस्तकातून दिसतो. तसंच या ही पुस्तकातून जाणवतं.

कवितेच्या दुनियेत रमलेल्या, वास्तवाची अगदीच जाणीव नसलेल्या आपल्या नव-याचा, त्याच्या सगळ्या सवयींचा होणारा जाच अगदी प्रेमाने सहन करणारी यशोदा……..!! वेगळ्याच धर्मातून आल्यामुळे लग्नाला माहेरचाच प्रचंड विरोध…… आणि सासरी आपला स्वीकार अगदी सहज झाल्यामुळे आलेलं उपकाराचं ओझं सांभाळता सांभाळता तिची अगदी ससेहोलपट होते. कायम पैशाची ओढाताण, नाजुक तब्येत, त्यामुळे होणारी ससेहोलपट….. सगळं जिवंत लिखाण. एका सर्वसामान्य संसारी स्त्री ची, संसाराची गाडी रुळावर ठेवण्यासाठी एकटीची होणारी तगमग, धडपड….. अगदी मनाला भिडते. 

त्यांचं लिखाण फार प्रामाणिक वाटतं. त्यांना त्यांच्या मर्यादांची असलेली जाणीव, काहीतरी करुन दाखवायची जिद्द, एकटीच्या हिंमतीवर सगळे कठीण प्रसंग निभावून नेणारी विचारसरणी…….सगळंच कौतुकास्पद वाटतं.

पुन्हा एकदा…….प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे उभ्या असण्या-या प्रचंड स्त्री शक्तीची जाणीव करुन देणारं पुस्तक !!

Next Page »

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.